अजून एक निर्भया वासनेची, क्रूरतेची बळी....
अजून किती निर्भया ???
सर्वांचा लाडका बाप्पा आला, गौराई आल्या सुवासिनींचा उत्साह गगनात मावत नव्हता. सगळ्यांची लगबग, धावपळ गौराईच्या सेवेसाठी सुरू होती. मध्ये थोडा वेळ मिळाला म्हणून टिव्ही च्या बातम्या थोडा वेळ पहाव्यात म्हणून टीव्ही सुरू केला, आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली. न्युज अँकर अर्थात लेडीज होती ती सांगत होती, मुंबई इथे म्हणजे साकिनाका इथे पहाटे 3 च्या दरम्यान म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं तीच पहाट एका तीस वर्षीय महिलेच्या आयुष्याची शेवटची पहाट ठरली.
एका हैवानाने तिच्या शरीराचे लचके तोडले, एवढ्यावरच न थांबता त्या हैवणाने तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करून तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लोखंडी रॉड अशाप्रकारे घुसवला की , डॉक्टरांनी सांगितले की तिची आतडी अक्षरशः आतमध्ये फाटली होती, ती रक्तबंबाळ अवस्थेत अत्यावस्थ अवस्थेत एका रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टेम्पो मध्ये पडून होती, नंतर तिला दवाखान्यात ऍडमिट केलं मात्र डॉक्टरांचे सगळे प्रयत्न फसले , त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं , आणि त्या महिलेची मृत्यशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.
क्षणभर काहीच कळेना, मन सुन्न झालं, किती भयंकर आहे हे, हृदय पिळवटून टाकणारी बातमी बघितली आणि ऐकली. अरे किती वेदना झाल्या असतील त्या बहिणीला , काय अवस्था झाली असेल त्या बहिणीची, ह्या रानटी , हैवणाचा तो त्रास तिनं कसा सहन केला असेल, तिनं किती धावा केला असेल मदतीसाठी, कुणीच कसं तिथं पोहचलं नसेल, असे एक ना अनेक वेदनादायी प्रश्न मनात फिरत होते.
टीव्ही वरती ही बातमी ऐकताना आणि पाहताना आपलं मन हेलावून टाकलं होतं, जिच्यावर प्रत्यक्षात हे पार्श्वी कृत्य घडलं तिचं काय झालं असेल ह्या विचारानेच काही सुचायचं बंद झालं होतं.
टीव्ही च्या बातम्या, डॉक्टर, राजकारणी, समाजकारणी, सेवादायी संस्था सर्वजण मीडिया समोर येऊन तेच तेच सांगत होते, तिच्या बाबतीत काय झालं अन कसं झालं.
अरे हैवणा, राक्षसा, तुझ्या साठी तरी हे शब्द सुद्धा लाजतील की रे, तुझी वासनेची भूक भागली होती ना रे, तू तिच्या अब्रूचे लचके तोडले होतेस की, मग निर्दयी,निर्लज्ज मानसा तिला द्यायचं होतंस की सोडून तसंच आणि जायचं होतंस तुझं काळं तोंड घेऊन. अब्रूचे लचके तोडून तुझं समाधान नाही झालं म्हणून ज्या भागातून तुझा जन्म झाला, तू हे जग बघितलं, आणि आज हे असं अमानवीय कृत्य करतोयस तोच स्त्रीचा प्रायव्हेट पार्ट लोखंडी रॉड खुपसून अस्तव्यस्त करून टाकलास.
हे कृत्य एव्हढं भयंकर होतं की आमच्या बहिणीची आतून आतडी फाटली होती, आणि तिची जगण्याची आशा मावळली. मृत्यू शी झुंज देत होती बिचारी, पण तिची जगण्याची इच्छाशक्ती नक्कीच मरून गेली असेल म्हणूनच तिच्या प्राणाची ज्योत ह्या क्रूरतेंन मालवली.
दिल्लीतील ती निर्भया अशाच अमानवी, पार्श्वी, अत्याचाराची बळी ठरली. तिच्यासाठी ती रात्र काळरात्र ठरली. अगदी तशीच घटना मुंबईत घडली. आणि ही आपली निर्भया तिच्या साठी ती पहाट काळ पहाट ठरली आणि या राक्षसाच्या पार्श्वी अत्याचाराची बळी ठरली.
आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही रणरागिणी, आम्ही जिजाऊच्या लेकी. तू दुर्गा, तू काली आणि तूच चंडी हे भाषणात शोभून दिसणारे शब्द. कोण चूक, कोण बरोबर, शासनाचं चुकलं, पोलीस व्यवस्था काय करत होती, गृहमंत्री कुठे होते, शासन डोळे झाकून बसलं होतं काय, प्रशासन काय करतंय, न्याय व्यवस्था चुकीची आहे, मग कँडल मार्च, मोर्चे,घोषणा, आणि थोड्या दिवसांनी सगळं शांत.
मग पुन्हा अशीच एखादी निर्भया आपल्या अब्रूची लक्तरे वाचवता वाचवता अशाच लांडग्यांच्या, राक्षसांच्या अमानवी, पार्श्वी कृत्याला बळी पडेल आणि मग हेच घोषणाबाजी करणारे, आम्हाला आया बहिणींची लयी काळजी असल्याचा आव आणून येतील पुढे आपली पोळी शेकून घ्यायला.
पण बस झालं आता. आता मोर्चे नको, अन घोषणा नकोत. आमच्यासाठी जर काय करायचं असेल तर आता फक्त एकच करा, या अशा हैवनांना बघता क्षणी सर्व समाजा समोर त्याला इतक्या वेदना देऊन , त्रास देऊन, त्याचे हाल हाल करून मारा की पुन्हा असं कृत्य करायला ही असली राक्षसं धजावणार नाहीत.
खरं तर लेख लिहिताना आणि आपल्याच एका बहिणीची ही हृदय पिळवटून टाकणारी , हृदय हेलावून टाकणारी घटना सांगताना आणि लिहिताना खूप वेदना होत होत्या. खूप संताप झाला होता, खूप राग येत होता, खूप चिडचिड झाली होती. मात्र लिहिणं गरजेचं होतं.
आपल्यातीलच कित्येक महिलांना ह्या गौरी गणपतीच्या सणामुळं आणि सणाच्या धावपलीमुळं कदाचित हे असं काहीतरी घडलंय हे देखील माहीत नसेल. आणि ही एकच घटना नाही बरं का, ही घटना घडली 10 तारखेला पहाटे, आणि अशाच बलात्काराच्या अनेक घटना घडल्या, पुणे, अमरावती, नागपूर, ठाणे, मुंबई. जवळ जवळ 10 ते 12 वेगवेगळ्या ठिकाणी अशा बलात्काराच्या घटना घडल्या. कुणाचं वय 6, कुणाचं वय 13 तर कुणाचं वय 30.
मैत्रिणींनो जाग्या व्हा. समाजात, आपल्या आजूबाजूला काय घडतंय जरा लक्ष ठेवा. माझं घर माझा संसार ह्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेंव्हा आपण सुरक्षित आहोत का या गोष्टीकडे लक्ष द्या. लोकं ओळखायला शिका. लोकांची वासनेने भरलेली नजर ओळखायला शिका. लोकांचा हेतू ओळखायला शिका. आणि मुख्य म्हणजे स्वतःला इतकं सक्षम बनवा की ह्या असल्या डोमकावळ्यांच्या टोच्यांनी रक्तबंबाळ न होता, वासनेची शिकार न होता आपलं स्वसंरक्षण, आत्मरक्षण आपण स्वतः करू अशा पध्दतीने स्वतःला तयार करा. अशा अमानवीय, राक्षसी वृत्तीच्या लोकांना आपल्या पासून आपण दूर ठेवू शकू. ह्या अशा लोकांना चार चोघात चांगलाच धडा शिकवायला सक्षम व्हा.
ह्या अशा राक्षसांना त्यांच्या वृत्तीनं, विचारानं,नजरेनं आणि मुख्य म्हणजे शरीरानं नपुसक बनवलं तरच मी, माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी सुरक्षित राहील. ह्या अशा अत्याचाराच्या बळी पडणार नाहीत.
🌹🌹🌹🌹🙏🙏 |
लेखन,
डॉ. मनिषा मोरे
95117751
0 टिप्पण्या
कृपया तुमच्या प्रियजनांना लेख शेअर करा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. 🙏 🙏